2 minutes reading time (445 words)

[Maharashtra Times]जवाब मिळेपर्यंत उत्सवाला अर्थ नाही... सुप्रिया सुळे यांची सविस्तर अहवाल देशासमोर सादर करण्याची मागणी

जवाब मिळेपर्यंत उत्सवाला अर्थ नाही... सुप्रिया सुळे यांची सविस्तर अहवाल देशासमोर सादर करण्याची मागणी

म.टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: 'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारला दिल्या. या मोहिमेबाबत सरकारने एक सविस्तर अहवाल करून तो देशवासीयांसमोर मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली.

या मोहिमेवरील चर्चेत बोलताना सुळे यांनी भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्या विखारी भाषणावर आसूड ओढले. विरोधी पक्षनेत्यांना विदेशात भारताची बाजू मांडण्यास पाठविणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे स्पष्ट करताना सुळे म्हणाल्या की, दहशतवादाच्या मुद्यावर संपूर्ण जगाने भारताला पाठिंबा दिला, तो आम्ही अनुभवला. जगभरात महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी या चार नेत्यांबाबत सर्वाधिक चर्चा असते. या मोहिमेवर बोलताना आमच्या पक्षाची भूमिका, देश प्रथम, राज्य नंतर, पक्ष नंतर व व्यक्ती सर्वांत शेवटी हाच क्रम होता, आहे व राहील, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या पक्षाचे अमर काळे यांचेही भाषण झाले.

ऑपरेशन सिंदूर मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थि करणे अयोग्य असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी केली. ते म्हणाले की, २६-११च्या मुंबई हल्ल्यावेळी देशाचे गृहमंत्री मुंबईकडे फिरकलेही नव्हते. पहगलगामनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी तिकडे धाव घेतली व आता हेच विरोधक विचारतात की, सरकार कोठे होते? हे हास्यास्पद आहे.

मन की बात तो सुना दी, अब देश की गुहार भी सुन लिजिये, असे उपरोधिकपणे सांगताना काँग्रेसच्या प्रणिती शिंदे म्हणाल्या की, या सरकारला प्रश्न विचारलेले आवडत नाही. कारण त्यांना जबाबदारीपासून पळायचे असते. पण, पहलगामबाबत देशाच्या माता-भगिनी, देशाची जनता तसे करू देणार नाही. सरकारला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे अरविंद सावंत यांनी पूर्ण घटनाक्रमावर टीकास्त्र सोडले. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी या सरकारने गमावली ती कोणाच्या दबावाखाली, असे विचारून ते म्हणाले, 'केंद्रीय मंत्री असताना व नंतरही मी अनेकदा काश्मीरमध्ये गेलो. कलम ३७० रद्द केल्यावरही तेथे पावलापावलावर सशस्त्र जवान तैनात असतात. पण, पहलगाम हल्ल्याच्या दिवशीच तेथे एकही सुरक्षा जवान कसा नव्हता. हे सारे संशयास्पद आहे. आपल्या गुप्तचर यंत्रणांचे अपयशही त्यातून समोर येते ते सरकारने स्वीकारले पाहिजे.

मुंबई लोकल स्फोटांबाबत अनेक निरपराधांना वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले होते. त्यांची उच्च न्यायालयाने नुकतीच सुटका केली, पण येथे पहलगाम हल्ला केलेले दहशतवादी १०० दिवस होत आले तरी मोकाट आहेत. याला काय म्हणायचे, असा उपरोधिक प्रश्न सावंत यांनी विचारला.काँग्रेसचे गौरव गोगोई, दीपेंद्र हुडा तसेच तृणमूलचे कल्याण बॅनर्जी, सपचे रमाशंकर राजभर, जदयूचे ललन सिंह आदींची भाषणे झाली. लोकसभेत रात्री अकरानंतरही चर्चा सुरू होती. 

...

Supriya Sule questions Government: जवाब मिळेपर्यंत उत्सवाला अर्थ नाही... सुप्रिया सुळे यांची सविस्तर अहवाल देशासमोर सादर करण्याची मागणी| Maharashtra Times

Supriya Sule on Operation Sindoor: सुप्रिया सुळे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर सवाल उपस्थित करत "दहशतवादी मोकाट असताना उत्सव कसा योग्य?" असा प्रश्न लोकसभेत विचारला. या मोहिमेबाबत सविस्तर अहवाल देशासमोर मांडावा, अशी मागणीही त्यांनी मोदी सरकारकडे केली.
[Lokmat]मोदींचं कौतुक पण भाजप खासदाराला झापले, सुप...
[Maharashtra Mirror]‘लाडकी बहीण’ योजनेत 4800 कोटीं...