[Sarkarnama]पुण्यातील आयटी हब बाबत सुप्रिया सुळेचं फडणवीसांना पत्र
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर साठलेल्या पाण्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर आता आयटी पार्क परिसरातील बत्ती सातत्याने गुल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत..
याबाबत सुप्रिया सुळे यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क हे जागतिक दर्जाचे केंद्र आहे. त्यादृष्टीने येथे उत्तम सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. हिंजवडी, राजीव गांधी आयटी पार्क, माण, मारुंजी आदी परिसरामध्ये नागरिकांना ट्रॅफिक, रस्ते, वीज, पाणी तुंबणे या सारख्या समस्यांना समोरे जावे लागत आहे.
या भागातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींवर लवकर मार्ग निघत नाही. यासाठी नागरीकांना एमआयडीसी, महापालिका, मेट्रो, पीएमआरडीए, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस खाते आदी आस्थापनांकडे मोठा पाठपुरावा करावा लागतो. या शासकीय आस्थापनांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने यामध्ये नागरीकांचा वेळ जातो. शिवाय मनस्ताप देखील सहन करावा लागत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले..
हे टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने हिंजवडी-माण-मारुंजी क्लस्टर आणि जांभे, गहुंजे, नांदे, लवळे, पिरंगुट, भुकुम आणि इतर शेजारील जलद शहरीकरण होत असलेल्या भागांसाठी एक स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करावी. या स्वतंत्र संस्थेची विशेष शहर विकास प्राधिकरण किंवा औद्योगिक नगर प्रशासन प्राधिकरण या स्वरूपात रचना करता येईल, ज्यामुळे एकात्मिक नियोजन, निधी व्यवस्था आणि सेवा पुरवठा यासाठी स्वायत्तता सुनिश्चित होईल. यामुळे नागरिकांना आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल, आपली मागणी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या..
याबाबत निर्णय होईपर्यंत सरकारने नेमलेल्या शासकीय आस्थपनांशी समन्वय साधण्यासाठी शासनामार्फत तातडीने एक सक्षम नोडल अधिकारी नेमण्यात यावेत, ज्यांच्याकडे नागरिक आपल्या अडचणींबाबत पाठपुरावा करू शकतील व नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबेल, असे सुळे यांनी म्हटले आहे.

