[ETV Bharat]सुप्रिया सुळे साईचरणी नतमस्तक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार खासदारांच्या फुटीबाबत म्हणाल्या....
शिर्डी (अहिल्यानगर) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनासाठी जात असताना त्यांनी शिर्डीत थांबून साई समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या आंदोलनासाठी रवाना झाल्या.
साईबाबांच्या दर्शनानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात चांगला पाऊस पडावा आणि बळीराजाला न्याय मिळावा अशी प्रार्थना आपण साईबाबांच्या चरणी केल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसंच महाविकास आघाडी एकत्र असल्याचं स्पष्ट करत त्यांनी राज्यातील आर्थिक परिस्थिती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे, ही चिंतेची बाब आहे असं सुळे म्हणाल्या.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीचा संदर्भ देत त्यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सरकारला लक्ष्य केलं. माझ्या जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय ही चिंतेची बाब आहे असंही त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका विनोदाचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टोला लगावला. आमदार-खासदारांबाबत समाजात ज्या प्रकारची चर्चा आणि उपहास होत आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचं त्यांनी म्हटलय.
पक्ष बदलण्याच्या राजकारणावर बोलताना त्या म्हणाल्या की, पक्ष बदलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र ज्या पद्धतीने सत्ता आणि पैशाचा वापर केला जातोय. त्याची चर्चा समाजात होत आहे. पुढची पिढी या राजकारणाकडे कसे पाहील, हा विचार करण्याचा विषय आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क असल्याचं सांगत सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणात बदलत आहे. राजकारणाची पातळी घसरत असल्याची भावना समाजात निर्माण झाली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चव्हाणांच्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी असल्याचं त्यांनी नमूद केलं.
राज्यातील नेत्यांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेवरही त्यांनी टीका केली. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सांगितले की, माध्यमांनी दाखवणे बंद केले तर काही लोक बोलणे बंद करतील. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार-खासदारांच्या फुटीबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या की ही चर्चा आमच्यासाठी नवीन नाही.

