[ETV Bharat]'लाडकी बहीण योजने'त घोटाळा, 'एसआयटी' चौकशी करा; सुप्रिया सुळेंच्या आरोपांनी महायुती सरकारची डोकेदुखी वाढणार
नवी दिल्ली : 'लाडकी बहीण योजना' सुरू झाल्यापासूनच विविध कारणांमुळं ही योजना चर्चेत राहिली आहे. कधी बोगस आधार कार्ड दाखवत या योजनेचे पैसे उकळले, तर कधी सरकारी महिला कर्मचाऱयांनीही या योजनेचा लाभ घेतला. आता तर चक्क अनेक पुरुषांनीच या योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळं या योजनेवरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत.
'लाडकी बहीण योजने'त घोटाळा : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'लाडकी बहीण योजने'वरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही सवाल उपस्थित करत महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत. "'लाडकी बहीण योजने'त ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा झालाय. महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात कसे गेले? या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा," अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत बोलताना केली.
सॉफ्टवेअरमध्ये घोटाळा : "योजनेच्या पहिल्या टप्प्यात २६ लाख फॉर्म कसे रद्द झाले नाहीत? सॉफ्टवेअरमध्ये घोटाळा आहे. त्यात घोटाळा झाला असल्यास त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल. त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. तसंच संपूर्ण मंत्रिमंडळाची देखील जबाबदारी आहे," असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत.
...तर संसदेत प्रश्न उपस्थित करणार : "राज्य सरकारनं या प्रकरणात कारवाई केली नाही तर संसदेत हा प्रश्न उपस्थित करणार आहे. मी कुणावरही भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले नाहीत आणि करणारही नाही. मी अदिती तटकरेंवर आरोप केले नाहीत. तसंच एकट्या अदिती यांच्यावर आरोप करणार नाही. याला संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार आहे," असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

