[My Mahanagar]हर्षवर्धन पाटील लवकरच योग्य निर्णय घेणार
सुप्रिया सुळेंच्या विधानाने भाजपचे राजकारण ढवळले
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कोसळधार पावसातही राजकीय नेत्यांचे दौरे आणि कार्यक्रम थांबत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांच्या फुटीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवार गटातील नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये भाजपचा एक बडा नेता शरद पवार गटात दाखल झाला आहे. तर आता पुणे जिल्ह्यातील एक नेता शरद पवार गटाच्या संपर्कात आहे.
इंदापूर मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळत चालल्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत. सध्या भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने मोठा विश्वास टाकलेला आहे. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आहेत. ते सध्या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हर्षवर्धन पाटील तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत का, याबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यावर खासदार सुळेंनी, "हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते आहेत. ते लवकरच योग्य निर्णय घेतील. तो राज्याच्या हिताचा असेल." असे म्हटले आहे. हर्षवर्धन पाटील योग्य निर्णय घेतील, या वक्तव्याने ते लवकरच तुतारी हाती घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील एकानंतर एक असे तीन नेते हे पवार गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजपचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे.
महायुतीमध्ये अनेक मतदारसंघ हे विद्यमान आमदारांना देण्याचे निश्चित मानले जात आहे. बारामती मतदारसंघातील इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आमदार आहेत. येथे हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे ते दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारीसाठी संपर्कात असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी हाती घेतली तर तो भाजपला मोठा धक्का मानला जाईल. कागलनंतर भाजपचा हा दुसरा बडा नेता असेल ज्यांनी उमेदवारीसाठी पक्ष सोडला.

