[Maharashtra Times]नसरापूरमधील नराधमाला कोर्टाकडून मृत्युदंड; सुप्रिया सुळेंनी केली आता कठोर मागणी
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: नरसापूर येथील चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निकालाचे स्वागत करत कोर्ट, पोलीस आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. "हा देश संविधानाच्या चौकटीत चालतो, त्यामुळे या नराधमाला भर चौकात लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे," अशी कठोर मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच, "या नराधमाला भर चौकात ठेचून काढलं पाहिजे," या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा दाखला देत त्यांनी या प्रकरणात कुठलेही राजकारण झाले नसल्याचे स्पष्ट केले.
'मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, राजकारण केलं नाही'
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्याच दिवशी आम्ही ठरवलं होतं की या प्रकरणात राजकारण आणायचं नाही. आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी आम्हाला आरोपीला कठोर शिक्षा करून देण्याचा शब्द दिला होता. मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि मी राष्ट्रवादीची आहे, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोर्टाला विनंती केली होती की, या नराधमाला भर चौकात ठेचून काढलं पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री, न्यायालय आणि पोलिसांचे मनापासून आभार मानतो."
'भर चौकात फाशी द्या, दया-माया चालणार नाही'
न्याय देण्याच्या प्रक्रियेतील एक मोठा टप्पा आपण पार पाडला असल्याचे सांगत सुळे म्हणाल्या, "आता नसरापूर प्रकरणातील आरोपीने कुठलीही दया-माया करण्याची मागणी केली, तरी ती अजिबात चालणार नाही. अशा नराधमांना कोणतीही माफी नसावी."
फास्ट ट्रॅक कोर्टामुळे न्याय लवकर मिळाला; पोलिसांचे कौतुक
"आम्ही या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली होती, त्यामुळेच हा निर्णय इतक्या लवकर येऊ शकला. महाराष्ट्र पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात जे कौतुकास्पद काम केले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. अशा नराधमांना थेट फाशीची शिक्षा झाली, तरच गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल आणि भविष्यात अशा भयानक घटना थांबतील," असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

