[ETV Bharat]'सरकारच्या परराष्ट्र धोरणात संभ्रम'; IND vs PAK सामन्यावरुन सुप्रिया सुळेंचे सरकारला सवाल
पुणे Supriya Sule on IND vs PAK Match : सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरु असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यावरुन देशभरात राजकारण तापलं आहे. यावर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपलं मत व्यक्त करत केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे जिल्हा परिषदेत भेट देत मतदारसंघातील कामाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बोलताना खायदार सुळे म्हणाल्या, "एकीकडे ऑपरेशन सिंदूर राबविताना खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही अस म्हणायचं आणि आत्ता दुसरीकडे क्रिकेट खेळता? देश पातळीवर आपण एकत्र असताना सरकारची याबाबत भूमिका बदलली आहे का? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. हा परराष्ट्र धोरणाचा विषय आहे. याबाबत आम्ही सांभाळून बोलतो कारण हा देशाचा विषय आहे. मात्र मी याबाबत प्रश्न विचारेल. एकिकडे म्हणायचं रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही आणि दुसरीकडे भलतंच काहीतरी सुरु आहे. या परराष्ट्र धोरणात संभ्रम आहे. सराकरनं एक काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे," अशा शब्दांत खायदार सुळे यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच याशिवाय नेपाळमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथं आपले काही लोक अडकले आहे त्याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की आम्ही पाठपुरावा करत आहोत. सगळ्या लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच जे लोक अडकले आहे त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारत-पाकिस्तान सामन्यावरुन शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "शिवसेनेची महिला आघाडी 14 तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. 'माझं कुंकू-माझा देश' असं आंदोलन केलं जाईल. 'सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै' असं आंदोलन असणार आहे. महिला मोदींना सिंदूर पाठवतील. ते अभियान सुद्धा आम्ही राबवणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतला आहे. अबुधाबीला भारत-पाकिस्तान सामना खेळवला जात आहे. हे लोकभावनेविरुद्ध आहे. 26 निरपराध लोक पहलगाम इथं मारले गेले, त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहत आहोत. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे, असं म्हणतात, पाकिस्तानचं कंबरडं मोडू असं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले. तसंच खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असं देखील म्हणाले. मग आता खून आणि क्रिकेट एक साथ कसं?" अशा शब्दांत राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
9 सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया चषकाला सुरुवात झाली असून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना 14 तारखेला दुबईमध्ये खेळला जाईल. तर 21 सप्टेंबर रोजी दोन्ही संघ सुपर फोरमध्ये पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. ही स्पर्धा टी-20 स्वरुपात होत आहे, जेणेकरुन पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी करता येईल. या स्पर्धेत भारतीय संघानं विजयी सुरुवात केली असून पहिल्या सामन्यात यजमान यूएईचा 9 विकेटनं दारुण पराभव केला आहे.

