[Sakal]MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?
पुणे - 'शहराची बदनामी करण्यासाठी कोणी खोटे 'नरेटिव्ह' सेट करत असतील, तर त्यांच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई का होत नाही? आपल्याला कुणी अडवले आहे का? तसेच, गुन्हेगारी घटली असेल तर जमावबंदीचा आदेश लागू करण्याची वेळ का आली?' असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना केला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासदार सुळे यांना पाठवलेल्या पत्रात पुण्यात गुन्हेगारी घटल्याचा दावा केला होता. तसेच, काही घटकांकडून 'नरेटिव्ह' सेट केले जात असल्याचे म्हटले होते. त्यावर सुळे यांनी मंगळवारी आयुक्तांना पत्र लिहून शहरातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली.
खासदार सुळे यांनी पत्रात म्हटले आहे की, 'आकडेवारी गुन्हे घटल्याचे सांगत असली तरी जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. रस्त्यांवर दहशत माजवणारी टोळकी आणि खुलेआम अमली पदार्थांचे जाळे ही पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीड आहे. विषारी दारूमुळे गेलेले बळी याचेच प्रतीक आहेत.'
नागरिक दहशतीखाली जगत असून, हे पोलिसांशी असलेला संवाद कमी झाल्याचे लक्षण आहे. माझी टीका पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी नसून, व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आहे,' असे सुळे यांनी स्पष्ट केले.

