[Sarkarnama]RSS’कडून सरकारवर 118 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
सुप्रिया सुळेंनी दाखवला आरसा
राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये 118 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप 'आरएसएस'ने केला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले..
पुणे दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सध्या राज्यामध्ये भ्रष्ट जुमला पार्टीचं सरकार आहे. हे सरकार सातत्याने लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतं आणि नंतर त्यांना क्लीन चीट देतं. भाजपचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मला विचारायचं आहे की, खरंच ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले ते भ्रष्टाचारी आहेत का?, असा सवाल सुळे यांनी केला..
आज राज्यात भ्रष्टाचार होतोय ही मात्र वस्तुस्थिती आहे. हे फक्त मी म्हणत नाहीये तर आरएसएस देखील महाराष्ट्रात भ्रष्टाचार होत असल्याचं बोलत आहे. मागील आठवड्यामध्ये आरएसएसने 118 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. हा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला आहे. डीबीटी च्या माध्यमातून जे पैसे शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक होते ते पैसे त्यांना मिळालेले नाहीत. यामध्ये 118 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरएसएसने केला असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
सध्याच्या सरकारमधील काही लोक ब्लॅकचं व्हाईट करणारी एजन्सी झाले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप करायचा आणि नंतर आमच्याकडे या आम्ही तुमचे ब्लॅकचे व्हाईट करून देतो असं सांगायचं. मग त्यांच्यासोबत गेल्यावर सुखाने नांदा आणि आमच्या सोबत सत्तेमध्ये राहा हा सध्याच्या सरकारचा कार्यक्रम सुरू असल्याचं टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
रवींद्र वायकर यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आमच्याकडून चूक झाली, असं स्पष्टीकरण दिलं आहे. अशी चूक कशी होऊ शकते. रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांचे कुटुंब कोणत्या अवस्थेतून गेलंय हे मी जवळून पाहिलं आहे. हीच अवस्था छगन भुजबळ, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या कुटुंबाची झाली होती, असे सुळे म्हणाल्या..खोटे आरोप करून ईडी, सीबीआयच्या केसेस लावायच्या, या भाजपाच्या युज अँड थ्रो च्या पॉलिटिक्समुळे मोठा त्रास आरोप केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला सहन लागत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि आता क्लीन चीट दिली आहे. ते नेते खरंच भ्रष्टाचारी होते का? याचे उत्तर भाजपने जनतेला द्यावे, अशी मागणीही सुळेंनी केली.
राज्यातील सरकार हे अतिशय असंवेदनशील असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. महागाई दिवसेंदिवस वाढत झालेली आहे. अशा परिस्थितीत खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्यावर मतदारसंघातील लाखो लोकांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे. मात्र हे असंवेदनशील सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुळे यांनी केला.

