[Maharashtra Times]सुप्रिया सुळे दिल्लीत सोनम वांगचुक यांच्या भेटीला, केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत मुद्दा मांडणार
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत जंतरमंतर मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिली. सोनम वांगचुक यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे या जंतरमंतर मैदानावर गेल्या. तिथे त्यांनी सोनम वांगचुक यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तरुणांना संबोधित केलं. सोनम वांगचुक यांची विचारपूस केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सोनव वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा आपण हिवाळी अधिवेशनात मांडू. तसेच हिवाळी अधिवेशनाआधी आणखी दोन ठिकाणी मांडू, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
"राज्यात आंदोलन चाललं असेल तर ती आमची नैतिक जबाबदारी आहे की, समाजात ज्या गोष्टी सुरु आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत. समाजातील पालकांमध्ये, तरुण पिढीत एक भावना आहे, इथे आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत, आमची नैतिक जबाबदारी असते की, समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या संसदेत मांडल्याच पाहिजेत", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हिवाळी अधिवेशनाआधी दोन ठिकाणी विषय मांडणार"संसद सुरु होण्याआधी दोन ठिकाणी मी या विषयावर बोलणार आहे. एकतर रविवारी सकाळी सर्वपक्षीय बैठकीत बोलणार आहे. केंद्र सरकारने ही रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस, त्याचबरोबर शिक्षणात झालेला सावळा गोंधळ, राम मंदिरचे जे व्हिडीओज येत आहेत, असे अनेक गंभीर विषय देशासमोर आहेत. सर्वपक्षीय बैठकीत हे सर्व विषय आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत बोलून मांडणार आहोत", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
"सोमवारी सकाळी 10 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मी इथल्या भावना आणि इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता याबाबत बोलणार आहे", अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
एनडीएममध्ये सहभागी होणार?सुप्रिया सुळे यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी "याबाबत मला तरी कल्पना नाही. ना एनडीएने मला फोन केला आणि ना मी एनडीएला फोन केला", अशी प्रतिक्रिा दिली.
"हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमचे मायबाप महाराष्ट्राची आणि देशाची जनता आहे. त्यांची कामे करण्यासाठी आम्ही निवडून येतो. त्यामुळे अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं. त्यामुळे आम्ही जातो. आम्ही फोटो काढतो. आम्ही ट्विट करतो. आम्ही ट्विट केले नसते तर तुम्हाला कळले असते का आमची भेट झाली?", असा सवाल त्यांनी केला.

