[Saam TV]पवार गटाच्या खासदारांची मोदींशी चर्चा; दुष्काळ, कांदा, पाणीप्रश्नांसह पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या सर्व खासदारांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले होते. सुरुवातीला ही भेट मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भात असल्याचे सांगितले जात होते; मात्र या ३० मिनिटांच्या बैठकीत खासदारांनी महाराष्ट्रातील महापुरुषांना 'भारतरत्न' देण्यासह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर पंतप्रधानांकडे मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील महापुरुषांना 'भारतरत्न' देण्याची मागणीपंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) ८ खासदारांनी महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचा गौरव करण्याची विनंती केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना देशाचा सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी आग्रही मागणी खासदारांनी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
महापुरुषांच्या सन्मानासोबतच राज्यातील सध्याच्या बिकट परिस्थितीवरही या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान, शेतीपिकांचे भाव आणि राज्यातील विविध विकास प्रकल्पांचे रखडलेले प्रश्न खासदारांनी पंतप्रधानांसमोर मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांचे म्हणणे अतिशय गांभीर्याने ऐकून घेतले आणि मांडलेल्या सर्व समस्यांवर योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

